पायाभूत सुविधा, रस्ते, उद्याने, आरोग्य, शिक्षण आणि वाहतूक व्यवस्था यांना नवीन दिशा मिळणार
वसई-विरार महानगरपालिकेने आगामी २० वर्षांसाठीचा विकास आराखडा (Development Plan DP) तयार केला आहे. ४५ लाख लोकसंख्येच्या अपेक्षित वाढीवर आधारित हा आराखडा प्रसिध्द केला आहे. या विकास आराखडामुळे शहराच्या पायाभूत सुविधा, रस्ते, उद्याने, आरोग्य, शिक्षण आणि वाहतूक व्यवस्था यांना नवीन दिशा मिळणार आहे.
विरार-नालासोपारा-वसई जोडरस्ते तयार करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. उद्याने आणि खेळाचे मैदाने, नवीन आरोग्य केंद्रे व रुग्णालये, शैक्षणिक संस्थांसाठी जागा, पाणीपुरवठा आणि सांडपाण्याची व्यवस्था यासाठी नवीन आरक्षणे निर्माण केली जाणार आहेत.
हिरवी पट्टे, जलस्त्रोत संरक्षण आणि प्रदूषण नियंत्रणावर भर देण्यात आला आहे. स्मार्ट सिटी संकल्पने अंतर्गत डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर, ई-गव्हर्नन्स आणि वाहतूक नियंत्रण प्रणाली वापरली जाणार आहे. शहरातील प्रत्येक प्रभागातील जमीन, इमारती, रस्ते यांचे डिजिटल सर्वेक्षण करण्यात आले आहे. यापूर्वी ड्राफ्ट आराखडा जाहीर करुन नागरिकांच्या हरकती व सूचना मागविण्यात आल्या होत्या तसेच विविध प्रभागांत जाऊन जनसुनावणी घेऊन नागरिकांच्या तक्रारी नोंदविल्या गेल्या होत्या. त्यानंतर प्राप्त सूचनांनुसार बदल करुन अंतिम आराखडा तयार करण्यात आला आहे.
महानगरपालिकेचा नवीन विकास आराखडा अंतर्गत १०० किमी पेक्षा जास्त नवीन रस्ते, फ्लायओव्हर देण्याचा मानस आहे. शहराला २४ तास पाणीपुरवाठा करण्यासाठी नवीन जलवाहिन्या टाकण्यात येणार आहे. मेट्रोचे काम प्रगतीपथावर आणण्यात येणार आहे. तसेच प्रदूषण टाळण्यासाठी नवीन ई-बस देखील वाढविण्यात येणार आहे. प्रती १००० लोकसंख्येमागे १ एकर उद्यान देण्याचा मनपाचा मानस आहे. अनधिकृत बांधकाम टाळण्यासाठी विशेष खबरदारी घेऊन नियोजित टाऊनशिप आणि स्लम रिडेव्हलपमेंटवर विशेष भर देण्यात येणार आहे.









