विरार पश्चिमेकडील विराट नगरातील आदित्यनाथ इमारतीचा बुधवार ११ डिसेंबर रोजी सायंकाळी आठच्या सुमारास सज्जा कोसळून मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. पालिकेच्या अग्निशमन जवानांनी घटनास्थळी पोहोचून इमारतीतील नऊ कुटुंबांना सुखरूप बाहेर काढले आहे.
आदिनाथ इमारत ही 35 वर्षे जुनी असल्याचे बोलले जात आहे. पालिकेच्या प्रभाग समिती ए चे सहाय्यक आयुक्त यांनी इमारत जुनी असल्याची इमारतीतील नागरिकांना नोटीस दिली होती. इमारत धोकादायक असल्याने त्या इमारतीला पालिकेने सहा महिन्यापूर्वी नोटीस ही बजावली होती असे सांगण्यात येत आहे. सुरक्षात्मक उपाययोजनात्मक म्हणून सोसायटीतील राहिवाशाना घर खाली करण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे. तत्काळ इमारतीचे लेखापरीक्षण करून इमारतीचा अहवाल सादर करावा अशी नोटीसमध्ये सांगण्यात आले होते. या इमारतीत एकूण ११ घरे आहेत.

कोसळलेला सज्जा हा इमारतीच्या बाहेरील भागात होता त्यामुळे इमारतीच्या तळमजल्यात असलेल्या काही गाळ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गाळ्यांचे शटर, स्टोअरेज सामग्री तसेच काही घरगुती व्यवसायांचे सामान यांचे नुकसान झाले. घटनास्थळी महापालिकेचे अग्निशमन दल, बोळींज पोलीस ठाण्याचे अधिकारी, पालिकेचे अभियंते आणि स्थानिक कर्मचार्यांनी तत्काळ पाहणी केली. इमारतीचा विस्तृत संरचनात्मक अहवाल प्राप्त होईपर्यंत कोणालाही पुन्हा इमारतीत प्रवेश न देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
वसई विरार शहरात यंदाच्या चालू वर्षात धोकादायक व जीर्ण झालेल्या इमारतीसह अन्य ठिकाणी स्लॅब कोसळण्याच्या घटना घडल्या आहे. या घटना ताज्या असतानाच आणखी एक घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.








