होम वसई - विरार विविध मागण्यांसाठी आदिवासी बांधवांचा वविशमपा मुख्यालयावर धडक मोर्चा

विविध मागण्यांसाठी आदिवासी बांधवांचा वविशमपा मुख्यालयावर धडक मोर्चा

57
0
विविध मागण्यांसाठी आदिवासी बांधवांचा वविशमपा मुख्यालयावर धडक मोर्चा

वसई विरार शहर महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोर शुक्रवार दि. ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी आदिवासी बांधवांनी विविध मागण्यांसाठी जोरदार आंदोलन केले. नालासोपारा, वसई आणि विरारमधील आदिवासी वस्त्यांना नियमित पाणी आणि चांगले रस्ते मिळावेत, महानगरपालिकेतील नोकऱ्यांमध्ये आदिवासी समाजाला योग्य आरक्षण मिळावे, आदिवासी मुलांसाठी शिष्यवृत्ती आणि प्राथमिक आरोग्य केंद्र उभारावीत, आदिवासी जमिनींवरील अतिक्रमण थांबवावे आणि कायदेशीर हक्क द्यावेत या प्रमुख मागण्यांसाठी आदिवासी समाजाने आंदोलन छेडले.

यावेळी आदिवासी एकता परिषद वसई तालुका अध्यक्ष दत्ता सांबरे यांनी प्रशासनाच्या दुर्लक्षाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, २०१७ पासून आम्ही अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजांसाठी झगडत आहोत. अनेक निवेदने देऊनही तोडगा निघालेला नाही, त्यामुळे आम्ही आयुक्तांना आमच्या मागण्यांसंबंधीचे निवेदन देणार आहोत आणि जोपर्यत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत हा मोर्चा सुरुच राहील.

आंदोलकांनी यावेळी शहरातील भूमाफियांकडून आदिवासींच्या राहत्या घराच्या व वहिवाटींच्या जागांवर अतिक्रमण झाल्याचा गंभीर आरोप केला. तसेच, ग्रामपंचायतीच्या काळात आमच्या नावावर असलेल्या जागांची घरपट्टी महापालिकेने रद्द करुन त्या जागा अनधिकृत ठरवल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. या आंदोलनामध्ये वसई तालुक्यातील १०८ आदिवासी पाड्यातील पाचशे आदिवासी आंदोलक सहभागी झाले होते. या आंदोलनात महिलांची संख्या लक्षणीय होती.