पालघर जिल्ह्यातील ‘खावडा पॉवर ट्रान्समिशन’ प्रकल्पाने वाडा, भिवंडी, विक्रमगड आणि जव्हार तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी ‘सर्वोच्च नुकसानभरपाई मॉडेल’ तयार करून आदर्श निर्माण केला आहे. या प्रकल्पाचे आणि भरपाई धोरणाचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी तोंड भरून कौतुक केले असून, प्रदेशातील इतर कंपन्यांना असेच मॉडेल अवलंबण्याचे आवाहन केले आहे.
नुकत्याच पार पडलेल्या उच्चस्तरीय बैठकीत पालकमंत्र्यांनी बाधित शेतकरी, कंपनी प्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसमोर हे कौतुक व्यक्त केले. बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, वाडा उपविभागीय अधिकारी, नोडल अधिकारी आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. खासदार डॉ. हेमंत सावरा, आमदार हरिश्चंद्र भोये आणि आमदार शांताराम तुकाराम मोरे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हे सुधारित दर निश्चित झाल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.
सर्वोत्तम भरपाई मॉडेलचे वैशिष्ट्य:
- तालुकानिहाय एकसमान दर निश्चित.
- काही गावांमध्ये २० पट जास्त नुकसानभरपाई.
- हा प्रकल्प ‘आदर्श प्रकल्प’ म्हणून ओळखला जाणार.
पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले की, “या सर्वोच्च दरांचा फायदा घेऊन भरपाई स्वीकारा. अन्यथा पुढील पर्याय फक्त न्यायालय राहील.” या निर्णयामुळे बाधित शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, प्रकल्पाची अंमलबजावणी वेगवान होईल.
तालुकानिहाय सुधारित नुकसानभरपाई दर (प्रति चौरस मीटर):
| तालुका | नवीन दर (रु.) | पूर्वीचा दर (रु.) | वाढ (%) |
|---|---|---|---|
| भिवंडी | ३,३०० | ६२.३३ | ५,२००%+ |
| वाडा | १,२५३ | ४०० पेक्षा कमी | २००%+ |
| विक्रमगड | ६२७ | ५० | १,१५०% |
| जव्हार | २४४ | १५.६५ | १,४५०% |










