विरारच्या खानिवडे परिसरात सूर्या धरणाची मुख्य पाणीपुरवठा पाईपलाइन फुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेत ३० ते ४० फूट उंच पाण्याचे मोठे फवारे उडताना दिसले. या दुर्घटनेमुळे लाखो लिटर पाणी महामार्गावर वाहून गेल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
सूर्या धरणातून वसई-विरार भागाला पिण्याचे पाणी पुरवठा करणारी ही मुख्य पाईपलाइन आहे. पाईपलाइन फुटल्यानंतर परिसरात नागरिकांची गर्दी झाली होती. घटनेची माहिती मिळताच वसई-विरार महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने तातडीने दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. मात्र, पाईपलाइन फुटण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
वसई-विरार परिसरात गेल्या काही दिवसांपासून पाणीटंचाईची समस्या भेडसावत आहे. एकीकडे नागरिकांना पाण्याअभावी हाल सोसावे लागत असताना, दुसरीकडे अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होणे ही प्रशासनासाठी मोठी लाजिरवाणी बाब ठरली आहे. स्थानिक रहिवाशांनी याबाबत प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत.
दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा सामान्य होण्यास काही वेळ लागू शकतो, असे सूत्रांकडून समजते. प्रशासनाने परिसरात पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले आहे.








